Maharashtra Assembly Election: '8 ते 10 ऑक्टोबर...', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठं विधान

Maharashtra Assembly Election: 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता शरद पवारांनी वर्तवली आहे. 15 ते 20  नोव्हेंबरदरम्यान मतदान होईल असाही त्यांचा अंदाज आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 29, 2024, 06:25 PM IST
Maharashtra Assembly Election: '8 ते 10 ऑक्टोबर...', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठं विधान title=

Sharad Pawar on Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष असताना शरद पवारांनी (Sharad Pawar) मोठं विधान केलं आहे. 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता शरद पवारांनी वर्तवली आहे. 15 ते 20  नोव्हेंबरदरम्यान मतदान होईल असाही त्यांचा अंदाज आहे. तसंच पुढच्या काही दिवसांत जागेचा निर्णय होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. आघाडी असल्याने काही जागा सोडाव्या लागतील असं सांगत शऱद पवारांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
 
गेल्या दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आली आहे. त्यांनी राजकीय पक्षांशी चर्चा केली. 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील असा माझा अंदाज आहे. त्या दिवसांपासून आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर अर्ज स्वीकारले जातील. साधारण 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल असाही अंदाज शरद पवारांनी व्यक्त केला आहे. 

महाविकास आघाडीचे उमेदवार निवडण्यासाठी समिती?

महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले या तिघांकडे असतील असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. या तिघांची समिती उमेदवारांबाबत माहिती घेईल, लोकांचा कल जाणून घेईल. त्यानंतर उमेदवार ठरवले जातील. येत्या 8 ते 10 दिवसांत या गोष्टी आम्हाला संपवायच्या आहेत असंही शरद पवारांनी सांगितलं. प्रत्येकाला वाटतं हा मतदारसंघ आपलाच आहे. आघाडी म्हटल्यावर काही निर्णय घ्यावे लागतात असं सूचक विधानही शरद पवारांनी केलं. 

शरद पवारांना यावेळी लोकसभा निवडणुकीची आठवणही करुन दिली. "तुम्हाला लोकसभेचं चित्र आठवत असेल. त्यावेळी वेगळं वातावरण झालं होतं. 400 पेक्षा जास्त जागा येतील असं मोदी सांगत होते. अनेक राजकीय पक्षाचे नेते वेगळे आडाखे बांधत होते. पण महाराष्ट्रातील जनतेचा सूर वेगळा आहे हे जाणवत होतं असंही शरद पवार म्हणाले. 

पुढे ते म्हणाले की, 5 वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली त्यात राष्ट्रवादी चार आणि काँग्रेसचा एक आला. राष्ट्रवादीने 10 जागा लढल्या असत्या त्यातील 8 आल्या. लोकांचं मत कार्यकर्त्यांशी संबंधित असल्याने आपल्याला यश मिळाले. बारामतीत अनेक नेते आपण जिंकणार सांगत होते. पण लोकांनी आणि तुम्ही ठरवलं होतं. 1 लाख 58 हजार मतांनी तुम्ही जागा निवडून आणली.